अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव परिसरात मोठी कारवाई करत 18 लाख 18 हजार रूपये किमतीचा 132.84 किलो गांजा, दोन मोबाईल व वाहन असा एकुण 25 लाख 43 हजार रूपयांच्या मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक केली आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, बातमीदारामार्फत एमएच 14 जीएच 2330 क्रमांकाची स्कॉर्पिओ कार कर्जत येथून पाथर्डीकडे गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना कळविण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व मिरजगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईचे नियोजन केले.
पथकाने मिरजगाव-कर्जत मार्गावरील महात्मा फुले चौकाजवळ सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ दिसताच ती अडवून तपासणी केली असता वाहनाच्या डिकीत चार गोण्या आढळून आल्या. चौकशीदरम्यान त्या गोण्यांमध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत गणेश अंकुश कराड (वय 32), सुखदेव शिवनाथ कदम (वय 30, दोघे रा. आगसखांड, ता. पाथर्डी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरूध्द मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके आदींनी सहभाग घेतला.




