शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भारत आता शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश राहिलेला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देश म्हणून उदयास येईल, असा ठाम विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Union Defense Minister Rajnath Singh) यांनी व्यक्त केला. शिर्डी एमआयडीसी (Shirdi MIDC) येथे निबे समूहाच्या अत्याधुनिक संरक्षणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या भव्य लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, निबे समूहाचे अध्यक्ष गणेश निबे, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, अनुप सिंघल, डीआरडीओचे सेक्रेटरी डॉ. समीर कामत, केंद्रीय सचिव संजीव कुमार, ब्रह्मविहारीजी महाराज, आ. राणा जगजितसिंह, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. आशुतोष काळे, आ. अक्षय कर्डिले आ. अमोल खताळ आ. विठ्ठलराव लघे यांच्यासह संरक्षण आणि उद्योग विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पाचे प्रवर्तक गणेश निबे उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाने संरक्षण उत्पादन क्षेत्रात धोरणात्मक सुधारणा, थेट परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन, परवाना प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्वदेशीकरणाला चालना देणारे निर्णय घेतल्यामुळे खासगी क्षेत्राचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील खाजगी उद्योगांचा वाटा आता 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून भारतीय उद्योग कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.




