मुंबई | Mumbai
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे आपल्या परखड बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांचे बोलणे हे अनेकदा आपल्या स्व पक्षीयांसाठी कानउघडणी करण्यासारखे असतात. ते स्पष्ट वक्ते म्हणून ओळखीचे आहे. त्यांनी अनेकदा भाजपातील नेते, मंत्र्यांना कानपिचक्या ही दिल्या आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा राजकीय घराणेशाहीच्या मुद्द्यावरून परखड मत व्यक्त करत, सर्वच राजकीय पक्षांना आणि कार्यकर्त्यांना डावलणाऱ्या नेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीवर टीका करणारेच नेते आगामी निवडणुकांमध्ये सगळे नियम धाब्यावर बसवून आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देत असल्याने यांनी खंत व्यक्त केली. वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिले जाते, याचे आपल्याला मनापासून वाईट वाटते, असे थेट विधान गडकरी यांनी केले.
घराणेशाहीच्या राजकारणाबद्दल राजकीय वर्तुळात नेहमीच टीका होत असते, पण सत्ताधारी पक्षाच्याच नितीन गडकरी यांनी यावर अत्यंत परखड भाष्य केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीच्या विरोधात थेट जनतेनेच निर्णय घ्यायला हवा असे म्हटले.
२०-३० वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळत नाही याचे वाईट वाटते
“मला खूप वाईट वाटतं की २०-३० वर्षे काम करणारा कार्यकर्ता तिकीट मागतो त्यावेळी कोणीतरी मंत्री म्हणतो माझ्या बायकोला किंवा मुलाला तिकीट द्या. त्याचे तिकीट जाते. हे खूपच दुर्भाग्य पूर्ण आहे. पण याला कारण जनता आहे. कोणत्याही पक्षाचे असे वारसदार उमेदवार उभे राहतील त्यांना निवडणुकीत जनतेने पाडले तर ते लोक त्यांना उभे करणारच नाही. जनतेने यावर प्रतिक्रिया द्यायला हवी. पण जनताच त्यांना निवडून देते आणि त्यांना स्विकारले जाते,” असे नितीन गडकरी म्हणाले.
राजकीय पक्षांनी कितीही घराणेशाहीवर टीका केली, तरी निवडणुकांमध्ये कुटुंबातील सदस्य आणि नेत्यांचे नातेवाईक यांनाच तिकीट देण्याची प्रवृत्ती वाढल्याचे गडकरी यांनी स्पष्टपणे नमूद केले. भारतीय जनता पक्षामध्येही अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विद्यमान नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आल्याची उदाहरणे आहेत.
अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत (स्थानिक स्वराज्य संस्था) भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आमदार किंवा खासदारांच्या पत्नी, मुले, किंवा जवळच्या नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी आलेल्या किंवा नेत्यांच्या वशिल्याने तिकीट मिळालेल्या उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





