Saturday, July 27, 2024
Homeराजकीयभाजपचे आंदोलन सुरु असतानाच आव्हाडांसाठी भुजबळ सरसावले; म्हणाले, "केवळ विरोधक म्हणून..."

भाजपचे आंदोलन सुरु असतानाच आव्हाडांसाठी भुजबळ सरसावले; म्हणाले, “केवळ विरोधक म्हणून…”

मुंबई | Mumbai

काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी महाड (Mahad) येथील चवदार तळे परिसरात मनुस्मृती दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला. त्यानंतर सत्ताधारी भाजपकडून (BJP)राज्यभर आव्हाडांचा निषेध केला जात आहे. तसेच आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आव्हाडांविरोधात आंदोलन केले. याशिवाय पुण्यातील एका पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून आव्हाडांवर टीका होत असताना दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण करत त्यांनी ‘माफी मागितली आहे’ असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड हे खूप चांगल्या भावनेने तिथे गेले होते. तिथे त्यांच्या हातून चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला. तो फाडताना त्यांनी त्यावर कोणाचा फोटो आहे ते पाहिले नव्हते. त्याप्रकरणी त्यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे. त्यामुळे आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. ते केवळ विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. आम्हाला शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा चंचूप्रवेश नको आहे. त्यामुळे आपण मुळ मुद्द्याकडे लक्ष दिले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

भुजबळ पुढे म्हणाले की, “माझी सर्वांना विनंती आहे की, बहुजन समाजातील तसेच दलित, ओबीसी, मराठा, ब्राह्मण, संपूर्ण महिला तसेच मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात समावेश नको यावर लक्ष दिले पाहिजे. नाहीतर आपले लक्ष दुसऱ्याच ठिकाणी केंद्रीत होईल”, असे म्हणत भुजबळांनी देखील मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला उघडपणे विरोध दर्शविल्याचे दिसून आले.

आव्हाडांकडून भुजबळांचे आभार

भुजबळांनी पाठराखण केल्यानंतर आव्हाड यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आव्हाड यांनी एक्स (ट्वीट) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर, आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या