कोलकाता | वृत्तसंस्था Kolkata
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीआणि राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मू यांच्यात शनिवारी प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्याची घटना घडली. उत्तर बंगाल दौऱ्यादरम्यान राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारचा वरिष्ठ मंत्री उपस्थित नसल्याने राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनीही सार्वजनिक सभेत यावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर आरोप केले.
एस्प्लेनेड येथील सभेत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, “आम्ही राष्ट्रपतींचा आदर करतो; मात्र त्यांना राजकीय अजेंड्यासाठी वापरले जात आहे.” त्यांनी भाजपवर संविधानाच्या मूल्यांना धक्का दिल्याचा आरोपही केला.
दरम्यान, उत्तर बंगालमधील आदिवासी मेळाव्यात बोलताना राष्ट्रपती मुर्मू यांनी मुख्यमंत्री किंवा मंत्री स्वागतासाठी न आल्याबद्दल खंत व्यक्त केली. कार्यक्रमासाठी मूळ ठिकाण म्हणून विधाननगर निवडले असताना राज्य प्रशासनाने परवानगी दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईपूर येथे हलवावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
“विधाननगरमध्ये मोठी जागा होती आणि अधिक लोक उपस्थित राहू शकले असते. मात्र कार्यक्रमाला परवानगी का मिळाली नाही हे मला समजले नाही,” असे राष्ट्रपती म्हणाल्या. तसेच त्यांनी “ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या आहेत” असे म्हणत वाद वाढवू नये, अशी भूमिका व्यक्त केली.
यावर प्रत्युत्तर देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हा कार्यक्रम राज्य सरकारचा नव्हता आणि त्याची अधिकृत माहितीही सरकारला नव्हती. “राष्ट्रपती कधी येतात याची माहिती मिळते तेव्हा आम्ही प्रयत्न करतो. पण प्रत्येक भेटीला मुख्यमंत्री किंवा मंत्री उपस्थित राहणे शक्य नसते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी सिलीगुडी परिसरात आयोजित आदिवासी संमेलनावरून हा वाद निर्माण झाला. सुरक्षा आणि लॉजिस्टिक कारणांमुळे कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी सिलीगुडीचे महापौर गौतम देब उपस्थित होते; मात्र राज्य सरकारकडून मंत्री उपस्थित नसल्याने प्रोटोकॉलवर प्रश्न उपस्थित झाले.





