नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहेत. यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण असणार, याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच सरकारकडूनही याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदाभार स्वीकारतील. न्यायमूर्ती सूर्यकांत या पदावर ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहतील.
सरन्यायाधीश गवई यांनी संबंधित पत्राची प्रत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनाही दिली. २३ ऑक्टोबर रोजी सरकारने सरन्यायाधीश गवई यांना पत्र लिहून शिफारस पत्र पाठविण्याची विनंती केली होती. निवृत्त होणारे सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्यासाठी सरकारला पत्र लिहितात. त्यानुसार, विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सोमवारी केंद्र सरकारला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची त्यांचा उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली. न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदाभार स्वीकारतील.
कोण आहे न्या. सुर्यकांत?
न्या. सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९८१ साली त्यांनी हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि हिसार येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.
त्यानंतर १९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी चंदीगडला गेले. तिथे त्यांनी संवैधानिक, सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले. ९ जानेवारी २००४ रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीश पदावर त्यांची नियुक्ती झाली. पुढे ५ ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. १२ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत.
न्या. सूर्यकांत यांच्याकडे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम करण्याचा तब्बल दोन दशकांचा अनुभव आहे. कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, भ्रष्टाचार, पर्यावरण अशा महत्त्वाच्या विषयांवर न्या. सूर्यकांत यांनी न्यायदान केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




