पंचवटी | प्रतिनिधी
सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी व वाघाडी नदीला आलेल्या पुरानंतर रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ, दगड, मुरूम, पाणवेली आणि विविध प्रकारचा कचरा साचला होता. पुराचे पाणी रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांमध्ये शिरल्याने मंदिरांमध्येही गाळ आणि कचऱ्याचा थर जमा झाला होता. पूर ओसरताच नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेत रामकुंड परिसरातील मंदिरांमधील गाळ, पाणवेली व तत्सम कचरा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच वाघाडी नदीच्या पुरामुळे म्हसोबा पटांगण आणि गौरी पटांगण येथे वाहून आलेला गाळ, दगड व इतर कचरा तीन जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात येत असून, अग्निशमन विभागाच्या वाहनांद्वारे संपूर्ण पटांगण धुण्याचे कामही सुरू आहे.
पडसाद : त्र्यंबकची माळीण होऊ द्यायची नसेल तर…
या स्वच्छता मोहिमेत आतापर्यंत १० टन ८६५ किलो पाणवेली व तत्सम कचरा संकलित करून खतप्रकल्पावर विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला आहे. घाट परिसर पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक अवेश पलोड, विभागीय अधिकारी राहुल जाधव तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक गणेश तांबे, हर्षद मारू, गोदावरी संवर्धन विभागाचे राजेश बोरिसा, विभागीय स्वच्छता निरीक्षक दीपक बोडके, सागर बिरुटे तसेच त्यांच्यासोबत १५ कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ७५ सफाई कर्मचारी आणि अग्निशमन विभागाचे संजय कानडे व त्यांचे कर्मचारी सहभागी झाले होते.




