अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रविवारी रात्री ते सोमवार दुपारपर्यंत झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी पावसात जिल्ह्यात राहाता आणि कोपरगाव तालुका वगळता उर्वरित 12 ठिकाणी पशूहानी, घरांची पडझड आणि मनुष्यहानी झालेली असल्याची माहिती प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. यात सर्वाधिक नुकसान हे पाथर्डी तालुक्यात झाले आहे. जिल्ह्यात पशूहानीत 137 जनावरे वेगवेगळ्या कारणामुळे दगावली असून चार व्यक्तींचा बळी गेला आहे. यासह वेगवेगळ्या तालुक्यात 153 घरांची पडझड झालेली आहे.
या पावसात सर्वाधिक नुकसान हे पाथर्डी तालुक्यात 2 व्यक्ती, 34 मोठी जनावरे, 93 लहान जनावरे आणि 43 घरांची पडझड झालेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानूसार जिल्ह्यात वीज पडून 3 जनावरे, 97 जनावरे पुराच्या पाण्यात तर 6 जनावरे घराची भिंती अथवा घर पडून मृत्यूमुखी पडली आहेत.
यात नगर तालुक्यात 1 व्यक्ती, 1 घराची पडझड, अकोले तालुक्यात 1 घर, जामखेड तालुक्यात 6 घरे, कर्जत 17 घरे, नेवासा 4 लहान जनावरे, 26 घरांची पडझड, पारनेर 1 मोठे जनावर, 1 लहान जनावर आणि 3 घरांची पडझड, राहुरी 11 घरांची पडझड, संगमनेर 1 मोठे आणि 1 लहान जनावर, 2 घरांची पडझड, शेवगाव 1 व्यक्तीसह 6 लहान जनावरे 38 घरांची पडझड, श्रीगोंदा 2 घरांची पडझड, श्रीरामपूर 3 घरांची पडझड झालेली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात दोन दिवसात 4 व्यक्ती, 36 मोठी जनावरे, 101 लहान जनावरे आणि 153 घरांची पडझड झाली आहे.
असे आहे जनावरांची हानी
पारनेर तालुक्यात 1 गाय व 1 शेळी वीज पडून, पाथर्डी 34 गायी, 30 करडे आणि 63 शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. संगमनेरमध्ये 1 गायी वीज पडून, शेवगावमध्ये 4 शेळ्या व 2 बोकड घरा भाग पडून मृत्यूमुखी पडले आहेत.





