मुंबई | Mumbai
लाडकी बहीण योजेनअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांना मिळणारे १५०० रुपये बंद झाले आहेत. ८० लाख महिला अपात्र ठरल्यानंतर महायुती सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेले नाही. डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाही आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या ऐंशी लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकार पुन्हा केवायसी सुरु करण्याच्या तयारीत
अलीकडे केलेल्या तपासणीत चार ते पाच लाख लाभार्थी असे निघाले ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे. अजूनही काही महिलांना वाटत असेल की, त्या पात्र असून त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली, तेव्हा या योजनेचे निकष होते. उत्पन्नाचे निकष होते. वयाचे निकष होते, शासकीय नोकरी असेल तर योजनेचा फायदा घेता येणार नाही. चारचाकी गाडी असेल तर योजनेत सहभागी होता येणार नाही, असे अनेक निकष होते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यामुळे निकषांची पडताळणी करण्याकरिता सुरुवात करताना केवायसी पडताळणी केली
सुरुवातीला योजना सुरू करताना सेल्फ सर्टिफिकेशन वर योजनेचा लाभ देण्यात आला. तेव्हा पडताळणी केली असती तर त्यात एक ते दीड वर्ष गेला असता. त्यामुळे तेव्हा पडताळणी न करता या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, योजनेला देण्यात येणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे त्यामुळे CAG ऑडिट केले जाते. त्यांच्याकडून विचारले जाते की याची पडताळणी तुम्ही केली आहे का? त्यामुळे निकषांची पडताळणी करण्याकरिता सुरुवात करताना केवायसी पडताळणी केली. आठ महिने केवायसी विंडो ओपन ठेवली. यामध्ये ज्या महिला आल्या त्यांना पात्र केले, अशीही माहिती समोर आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




