मुंबई | Mumbai
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोप असलेले वाल्मिक कराड हे आज २२ दिवसांनंतर पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असून त्यांच्यावर विरोधकांकडून संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून या प्रकरणात पुणे सीआयडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Murder Case) प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, हे मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलो आहे. कुणालाही अशाप्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही. सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळेच आज वाल्मिक कराडला (Walmik Karad) शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके कामी लागले आहेत.कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही,सर्वांना शोधून काढले जाईल, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, आजच मी स्व.संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. त्यांनाही मी आश्वस्त केले आहे. जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील, हा विश्वास त्यांना दिला असल्याचे”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? याबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कोणता गुन्हा दाखल होईल? कसा होईल? याबाबत सगळी माहिती पोलीस देतील, ते पोलिसांचे (Police) काम आहे. पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.