मुंबई | Mumbai
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. सरपंच हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याला सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली होती. या मोर्च्यात सर्व पक्षीय नेत्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार असलेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालकांना दिले आहेत.
बीड हत्या प्रकरणात १९ दिवस उलटले आहेत. हत्या प्रकरणातील सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्याप आरोपी आहे. या फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करा. तसेच धनजंय मुंडे यांना हाकला आणि वाल्मिकी कराडला अटक करा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना देण्यात आले आहे. त्याबरोबरच बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा,असे आदेश बीड पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे आणि तातडीने फेरआढावा घ्या, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.