मुंबई | Mumbai
देशातील 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने देशभरात जल्लोष सुरू केला असून मुंबईसह महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी देखील आनंदोत्सव केला. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनीही एकत्र येत रसगुल्ला वाटून विजयोत्सव साजरा. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येथून विजयबद्दल आनंद व्यक्त करत हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे म्हटले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. २९३ जागांपैकी एकूण २०२ जागांवर भाजपा आघाडीवर असून, २१ जागी भाजपा उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष एकूण ८५ जागांवर आघाडीवर असून, ८ जागांवर तृणमूलचे उमेदवार विजयी झाले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, देशभरात विजयोत्सव साजरा केला जात आहे. या वेळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
हा दिवस सगळ्यांसाठी ऐतिहासिक आहे. पश्चिम बंगालमध्ये गेलो होतो, तेव्हा पत्रकार परिषदेत तिथल्या एका पत्रकाराने विचारले होते की, ममतादीदी म्हणतात भाजपा आणि त्यांचे नेते बंगालच्या बाहेरचे आहेत. बाहेरचे लोक मते मागतात. मी पत्रकारांना सांगितले की, भाजपाची स्थापना ज्यांनी केली, ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच पश्चिम बंगालचे होते, त्यामुळे खऱ्या पश्चिम बंगालचा पक्ष कोणता असेल, तर तो भारतीय जनता पक्ष आहे. पश्चिम बंगलाच्या जनतेने ममता दीदींना दाखवून दिले की, पश्चिम बंगालचा खरा पक्ष कोणता आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन नुसते परिवर्तन नाही, तर महापरिवर्तन करून दाखवले. ते इतके आहे की, दोन तृतीयांश संख्याबळ भाजपाला मिळते आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
बंगालच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं
आज बंगलाच्या जनतेनं दीदींना दाखवून दिलं, बंगालचा खरा पक्ष कोणता आहे. बंगालच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन बंगालमध्ये पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन करुन दाखवलं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आज केवळ भाजप जिंकली नाही, तर संपूर्ण भारत जिंकला
बंगाल, आसाम, पद्दुचेरीतील हा विजय भारतीयांचा मोदींवर असलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. आजही जनतेला एकच गोष्ट माहितीय, मोदी है तो मुमकीन है… अशी घोषणाबाजीही फडणवीसांनी केली. बंगालमधून कुशासन बाहेर काढण्याचं काम 30 वर्षे काँग्रेस, 36 वर्षे कम्युनिष्ट आणि या दोघांपेक्षाही खतरनाक 15 वर्षे ममता दीदीचं शासन होतं. बंगालची अवस्था या सर्व राज्यकर्त्यांनी कमी करुन ठेवली, असे म्हणत आता परिवर्तन झाल्याचं फडणवीसांनी महटलं. ममतादीदी तुम्ही कितीही अत्याचार केला, तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही थांबवू शकणार नाही, असा हा आजचा विजय आहे. आज केवळ भाजप जिंकली नाही, तर संपूर्ण भारत जिंकला आहे. आसामप्रमाणे आता बंगालही भारताच्या वाटचालीत निर्णयाक भूमिका बजावेल, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींवरचा विश्वास जनतेने मतपेटीतून दाखवला आहे. आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि आधुनिक राजकारणातील चाणक्य अमित शाह यांनी ज्या प्रकारे योजना तयार केली आणि आपले नेतृत्व काय आहे, ते दाखवून दिले. तसेच आपले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, नेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. पश्चिम बंगलचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाही. पश्चिम बंगालचा विजय हा भारतात होणारी घुसखोरी, भारतावर होणारे हल्ले यापासून भारताला वाचवणारा विजय आहे, असेही फडणवीस म्हणाले.




