मुंबई | Mumbai
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचे वारंवार दिसून येते. महायुतीत तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य नितेश राणेंनी केल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना खडसावले आहे. धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना, नितेश राणेंनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे वक्तव्य केले होते. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केले आहे. फडणवीस यांनी नितेश राणे यांना या प्रकरणावरून समज दिली आहे.
राज्यात भाजपाचे सरकार असून, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी स्वतः याबाबत मला सांगितले की माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितले की, तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ जातो, ते अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. ही बाबत त्यांनी मान्य केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
नितेश राणे काय म्हणाले होते?
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर नितेश राणे यांनी भाष्य करताना मित्रपक्षांना इशारा दिला होता. “कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा,” असे नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणेंचा इशारा स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांसाठी होता. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





