अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरसह राज्यातील वेगवेगळ्या भागात सध्या सुरू असणारी थंडी 31 डिसेंबरनंतर संक्रातीपर्यंत टिकून राहणार आहे. विशेष करून उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण चांगले राहणार आहे. दरम्यान 19 तारखेपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यभर पारा एक किंवा दोन अंशांनी वाढणार असला तरी त्यानंतर पुन्हा थंडीचा तडाखा कायम राहणार आहे.
राज्यातील थंडीबाबत माहिती देताना पुण्याचे हवामान तज्ञ माणिकराव खळे यांनी सांगितले, राज्यात जळगाव, धुळे, अहिल्यानगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात थंडीचा मुक्काम राहणार आहे.
राज्यात सध्या सर्वात कमी तापमानाची नोंद करमाळ्याच्या जेऊर येथील असून संक्रातीपर्यंत ती कायम राहण्याचा अंदाज आहे. विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यात 19 ते 23 तारखेदरम्यान तापमान एक किंवा दोन अंशांनी वाढणार आहे. मात्र त्यानंतर पुन्हा डिसेंबरअखेर ते मकर संक्रांतीपर्यंत राज्यातील थंडी टिकून राहणार असल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.
डिसेंबर अखेर पुन्हा थंडीची लाट
राज्यात यंदा 9 नाव्हेंबरपासून दमदार थंडीला सुरूवात झाली. ही थंडी पुढील महिन्यांत 15 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. सध्या मुंबई आणि कोकणात समुद्र किनारी देखील थंडी जाणवत आहे. राज्यात डिसेंबरअखेर पुन्हा थंडीची एक लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ खुळे यांनी व्यक्त केला आहे.





