मुंबई | Mumbai
‘बहुचर्चित ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या तीव्र असंतोषामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी “आंदोलक विद्यार्थी आणि सरकार यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यासाठी मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, या चर्चेचा परिणाम म्हणून आज शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला आहे,” असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले.
यावेळी ते म्हणाले की, “दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून तरुणांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले आहे. पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मात्र, युवा पिढीने अत्यंत संयमाने आणि शांततेने आपल्या भावना देशाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या. देशातील युवाशक्तीला खंबीर नैतिक पाठबळ दिल्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे आभार. हा लोकशाही (Democrocy) आणि युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय आहे”, असे शरद पवारांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींसोबच्या भेटीवरही स्पष्टीकरण
दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या चर्चांवर बोलतानाही शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ” मी स्वतः पंतप्रधानांना भेटून लोकशाहीत संवादाचे महत्त्व पटवून दिले. संवाद न ठेवल्यास परिस्थिती बिघडू शकते, हे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. पंतप्रधानांना मी सांगितले की, एक तर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या किंवा आंदोलकांशी संवाद सुरू करा. तुमच्या मंत्रिमंडळातील दोन-तीन ज्येष्ठ सहकाऱ्यांना आंदोलकांशी चर्चेसाठी पाठवा. मी सीजेपीचे अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशीही बोललो होतो. सरकारने संवादाची तयारी दाखवल्यास चर्चा नाकारू नका, असा सल्ला मी त्यांना दिला होता. सुदैवाने पंतप्रधानांनी संवादाची तयारी दर्शवली आणि त्याचेच फलित म्हणजे आज शिक्षणमंत्र्यांचा झालेला राजीनामा आहे” असे शरद पवारांनी म्हटले.




