सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – परदेशात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झालेला आहे. याचा परिणाम अAनेकांच्या लग्नावरही झाल्याचे दिसत आहे. सध्या लग्नाचा हंगाम असल्याने पुणे शहर जिल्हा आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे दोन हजारावर लग्न सोहळे लांबणीवर पडले. लॉकडाऊनमुळे विघ्न आलं आहे.
लॉकडाऊन आता 17 मे पर्यंत वाढल्याने काहिंनी पुढच्या मुहुर्ताचा शोध सुरु केला आहे, तर काहींना दिवाळीनंतरंच लग्न उरकावं लागणार आहे. यादरम्यान काही नवरदेव मात्र संकटात सापडलेलं लग्न उरकण्यासाठी धळपळ करताना दिसत आहेत.
लग्नासाठी अनेकांनी मोठी तयारी केली होती. मुहूर्त काढले, पण बंदमुळे ते दोन तीन वेळा पुढे ढकलले. आता जून, जुलै मधील काढीव मुहूर्त आहेत, पण त्याचीही शाश्वती नाही. लॉकडाऊनमुळे लग्नचं संकटात आली आहेत. लॉकडाऊनमध्ये लग्नाची परवानगी मिळत नव्हती. आजचा मुहुर्त हुकला तर दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यामुळे काही कुटुंबांनी घरातच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वैदीक पध्दतीने लग्न उरकली आहेत.
मंगल कार्यालय बुकिंगच्या आकडेवारीनुसार या लॉकडाऊनमुळे साधारण दोन हजारपेक्षा जास्त लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये ज्यांची लग्न होती, त्यांनी 14 एप्रिलनंतरचा मुहुर्त ठरवला होता. पण लॉकडाऊन तीन तारखेपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे मग काहिंनी 3 मे नंतरच्या तारखा निश्चित केल्या होत्या. पण आता लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आल्याने लग्नात विघ्न आलेल्या साधारण हजारांच्या वर भावी वर-वधूंना आता दिवाळी नंतरच्या मुहुर्ताशिवाय पर्याय नाही. ज्यांना घाई आहे त्यांनी जून, जुलैचे काढीव मुहूर्त पाहीले आहेत, पण करोनाची परिस्थिती काय असेल त्यावर सर्व अवलंबून आहे. मंगल कार्यालय मालकांचे त्यात मोठे नुकसान झाले आहे.




