अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य शासनाने मागील हंगामात असणार्या एक रुपयात पीक विमा योजनेत यंदा बदल केला. यंदाच्या पिक विमा योजनेतील नवीन नियमावलीत जाचक अटी असल्याची तक्रार करीत शेतकर्यांनी योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी पिक विमा योजनेला सहभागी शेतकर्यांची संख्या 5 लाख 54 हजार होती. तर त्यांच्या अर्जाची संख्या ही 11 लाख 66 हजार होती. यंदा जिल्ह्यात 15 दिवसाच्या मुदत वाढीनंतर अवघ्या 2 लाख 21 हजार 47 शेतकर्यांनी विम्यासाठी नोंदणी केली असून त्यांच्या अर्जाची संख्याही 4 लाख 33 हजार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिक विमा योजनेत 3 लाख 33 हजार शेतकरी तर त्यांचे 7 लाख 33 हजार अर्जाची संख्या घटली आहे.
2023 च्या खरीप हंगामापासून राज्यात एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात येत होती. शेतकरी केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होऊ शकत होते. मात्र, आता राज्य सरकारने ही योजना बंद केली. आता शेतकर्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के, रबी हंगामासाठी 1.5 टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के एवढा हप्ता भरावा लागणार आहे. एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकर्यांना एकूण चार ट्रिगरच्या आधारे भरपाई दिली जात होती. नवीन बदलांनुसार, यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत.
आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे. हे नियम जाचक ठरत असल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे. नगर जिल्ह्यात कर्जदार 704 तर बिगर कर्जदार शेतकर्यांन पीकविम्यासाठी नोंदणी केली आहे. यात 14 तालुक्यातून 2 लाख 21 हजार शेतकर्यांनी 4 लाख 33 हजार 59 अर्ज पिका विमा योजनेत भरलेले आहे. खरीप हंगामात शेतकर्यांनी जेवढे पेरले, तेवढीच नोंद पीक विम्याच्या अर्जात करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता यंदाच्या शासन निर्णयात काय बदल करण्यात आले, याची माहिती घेऊनच अर्ज भरण्याचे शेतकर्यांना सांगितले होते. बोगस विमा उतरवल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पाच वर्ष काळ्या यादीत टाकून त्याला पाच वर्ष कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, असे शासनाकडून सांगण्यात आले होते.
योजनेतील सहभागी शेतकरी
अहिल्यानगर 10 हजार 190, अकोले 12 हजार 583, जामखेड 20 हजार 636, कर्जत 9 हजार 688, कोपरगाव 13 हजार 344, नेवासा 30 हजार 837, पारनेर 20 हजार 832, पाथर्डी 21 हजार 707, राहाता 14 हजार 675, राहुरी 15 हजार 532, संगमनेर 13 हजार 516, शेवगाव 19 हजार 695, श्रीगोंदा 7 हजार 230, श्रीरामपूर 10 हजार 682.
15 दिवसात वाढले 65 हजार शेतकरी
जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत अवघे 1 लाख 56 हजार शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी झाले होते. 31 जुलैला ही मुदत संपणार होती. मात्र, राज्य सरकारने प्रयत्नपूर्वक केंद्राकडून पिक विमा योजनेला 14 ऑगस्टपर्यंत 15 दिवसांची मुदत वाढवून घेतली. या कालावधीत जिल्ह्यात सुमारे 65 हजार शेतकरी पिक विमा योजनेत वाढले आहे. अन्यथा जुलैअखेर जिल्ह्यात 1 लाख 60 हजारांपर्यंत पिक विमा योजनेतील सहभागी शेतकर्यांची संख्या असती.




