तुळशीचे लग्न पार पडले आणि अनेक घरांमध्ये लगीनघाई सुरु झाली. आगामी काळात देशात सुमारे 35 लाख लग्न होणार असल्याची माहिती माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. व्यापार्यांच्या एका राष्ट्रीय संघटनेने ही माहिती दिल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलतात. विवाह परंपरा त्याला अपवाद नाही. त्यात देखील आमूलाग्र बदल होत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
हे देखील वाचा – संपादकीय : २६ नोव्हेंबर २०२४ – जीवनगाणे गातच राहावे
लग्नविधी तेच असले तरी हौसेला मात्र खूप महत्त्व दिले जाताना आढळते. लग्न एकदाच होते असे गृहितकही हौसेला पूरक ठरते. विवाह सोहळे किमान पाच दिवस तरी चालतात. डेस्टिनेशन वेडिंग, प्री आणि पोस्ट वेडिंग शूट, संगीत सेरेमनी, मेहंदी सेरेमनी असे वेगवेगळे नवप्रवाह युवा पिढीत खूप लोकप्रिय आहेत. या हौसेला खरोखरच ‘मोल’ लागते तरीही लग्न असेच पार पडावे असे बहुसंख्य युवांचे स्वप्न तरी असतेच. अनेकांना साधेपणाने विवाह करायची इच्छा असते. तथापि सामाजिक दबाव असतो अशी त्यांची भावना असते.अर्थात या सगळ्या गदारोळात लग्न साधेपणाने करून समाजसमोर आदर्श उभा करणारे युवा देखील सापडतात.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
नुकताच असा एक विवाह हरियाणा-महेंद्रगड येथे पार पडला. वधूच्या कुटुंबीयांकडून वराने 11 रोपे घेतली. ती लावण्याचे आश्वासन दिले. विवाहाला हजर असणार्या वर्हाडींना देखील रोपांचे वाटप केले. दोन्ही कुटुंबांनी एकमताने तो निर्णय घेतला होता. वृक्षारोपण हा पर्यावरण प्रदूषणावरचा एक प्रभावी उपाय मानला जातो. त्यात खारीचा वाटा उचला असे वधू-वराने माध्यमांना सांगितले. साधेपणाने पार पडणारे आणि वेगळी वाट चोखाळणारे असे विवाह समाजाला दिशादर्शक ठरू शकतील. हे जरी खरे असले तरी विवाह परंपरा हजारो प्रकारचे पूरक रोजगार निर्माण करते हे दखलपात्र आहे.
या व्यवसायाने अकुशल व्यक्तींसाठी रोजगाराचा मोठाच आधार निर्माण केला आहे. मोठी आर्थिक उलाढाल होणारे हे चौथे क्षेत्र आहे असे म्हटले जाते. यावर्षी आगामी दोन महिन्यात पार पडणार्या लाखो विवाहांमुळे सुमारे साडेचार ते पाच कोटींची उलाढाल होऊ शकेल, असे उपरोक्त वृतात म्हटले आहे. म्हणजेच तेवढ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. लोकसंख्येत जगात दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारत देशात बेरोजगारी वाढतच आहे.
विवाह उद्योग बेरोजगारीला काही प्रमाणात पर्याय ठरू शकेल याकडे दुर्लक्ष करता येऊ शकेल का? तेव्हा आर्थिक परिस्थिती सधन असणार्या लोकांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या घरचे विवाह दणक्यात साजरे करावेत आणि ज्यांना साधेपणा आवडतो त्यांनी त्यांनी त्याचा अवलंब करणे असा सुवर्णमध्य समाजमान्य ठरू शकेल.