Wednesday, May 28, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : २८ मे २०२५ - बदल अपरिहार्य

संपादकीय : २८ मे २०२५ – बदल अपरिहार्य

ए आय तथा कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचे आश्चर्य अजूनही ओसरलेले नाही. तथापि तिच्यामुळे निर्माण होणार्‍या आव्हानांचा वेध घेऊन त्यावर उपाययोजनांचा शोध घेण्याची प्रक्रिया मात्र हळूहळू वेग घेत आहे. शिक्षण, व्यवसाय किंवा उदरनिर्वाहाच्या विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास शिकणे मानवासाठी अपरिहार्य आहे. त्यासाठी माणसाला त्याच्या कार्यपद्धतीत बदल करावे लागतील, असा सूर एका परिषदेत वक्त्यांनी व्यक्त केला. त्यातील मतितार्थ प्रामुख्याने संशोधक आणि तज्ज्ञांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

तंत्रज्ञानाच्या बाबतीत समाजात मोठ्या प्रमाणात निरक्षरता आढळते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हे सामान्य माणसांच्या लक्षात येईलच असे नाही किंवा आले तरी कदाचित त्याला उशीर झालेला असू शकेल. तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अन्य डिजिटल साधनांच्या वापराची हातोटी शिकणे, तिचा दैनंदिन कामात वापर करणे आणि त्यासाठीचे प्रयोग युवांनी करावेत यासाठी अभ्यासक आणि तज्ज्ञांना पुढाकार घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, काही डिजिटल साधनांचा वापर भाषा शिकण्याचे साधन म्हणून केला जाऊ शकेल.

अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अन्य डिजिटल साधन तंत्रज्ञानाच्या फारशा खोलात न जाता त्याचा वापर करून घेणारे बदल हळूहळू दृष्टिपथात येतात. सातारा, सर्कलवाडी येथील एका शेतकर्‍याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने डाळिंब शेती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतीची अनेक कामे सोपी होऊ शकतील, अशी अपेक्षा त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केली. चेरीची झाडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हिरवीगार ठेवण्याचे प्रयत्न जपानमध्ये सुरू आहेत. शेती क्षेत्रातील अनेक कामे सोपी होऊ शकतील याकडे तज्ज्ञ लक्ष वेधून घेतात. हे वानगीदाखलचे उदाहरण आहे.

अन्य क्षेत्रात या साधनांच्या वापरावर, त्यात सुरू असणार्‍या जगभरातील प्रयोगांवर तज्ज्ञ माध्यमांत लिहित आहेत. त्याची माहिती माणसांनीदेखील घ्यायला हवी. अर्थात, असे शोध मानवापुढे वेगवेगळे प्रश्न निर्माण करेल. त्यामुळे बेरोजगारीची भीती व्यक्त होते. तज्ज्ञही ती नाकारत नाहीत. तथापि शोध लागतच राहतील. ते टाळणे सामान्य माणसांच्या हातात नाही हे जरी खरे असले तरी यासाठीच्या माहितीचा स्रोत माणूसच असतो. त्यामुळे त्याच्या परिणामांचा अंदाज माणूसच घेऊ शकतो याकडे तज्ज्ञ लक्ष वेधून घेतात. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळाचा वेध घेऊन तशी कौशल्ये प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे मात्र माणसांच्याच हातात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगर-दौंड मार्ग 50 वर्षांत प्रथमच बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी (दि.27) पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. सुमारे चार ते पाच तास चाललेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील पूर्णा आणि वालुंबा...