Friday, August 28, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : ७ डिसेंबर २०२४ - चौकटीबाहेरचे प्रयत्न

संपादकीय : ७ डिसेंबर २०२४ – चौकटीबाहेरचे प्रयत्न

सरकारी व्यवस्था अनेक वेळा जनता आणि प्रसार माध्यमांच्या टीकेची धनी होते. याचबरोबर अनेक सामाजिक संस्था प्रशासकीय यंत्रणेतील उणिवा आणि गैरप्रकार धसास लावण्याचा प्रयत्न करतात. सरकारी सेवकांची काम करण्याची मानसिकता हा त्यातील प्रमुख मुद्दा असतो. या सगळ्या खटाटोपामागे जनतेचे भले व्हावे, हाच उद्देश असतो. विशेषतः आरोग्य यंत्रणेचा समाचार वारंवार घेतला जातो. कदाचित लोकांची ती दैनंदिन गरज बनली असावी. कारण घरातील कोणत्या ना कोणत्या सदस्याचे आरोग्य ऋतुमानानुसार बिघडू शकते. समाजाच्या फार मोठ्या हिश्श्याला सरकारी आरोग्य व्यवस्थेचाच आधार असतो. त्यामुळेच या व्यवस्थेकडे संबंधितांचे लक्ष जात असावे. तथापि यंत्रणेच्या बलाढ्य चौकटीतसुद्धा अनेक अधिकारी चौकटीबाहेरचा दृष्टिकोन बाळगताना दिसतात..

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ हा टीकात्मक ठसा धूसर करण्याचे काम त्यांच्या परीने करतात. बीड परिसरात ऊसतोड कामगारांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी ऊसतोडणीला जाऊन रात्री उशिरा परतणे ही त्यांची दिनचर्या! गरज आणि इच्छा असूनही त्यांना सरकारी आरोग्यसेवेचा लाभ घेणे अशक्य होत असेल. ही उणीव बीड जिल्हा रुग्णालयासह इतर काही उपकेंद्रांच्या डॉक्टरांनी दूर केली. डॉक्टरांचे एक पथक रात्री उशिरा त्यांच्या वस्तीवर
पोहोचले. त्यांनी गरजूंवर उपचार केले. मोबाईलच्या उजेडात आरोग्यसेवा दिल्याची माहिती वृत्तपत्रांतील बातमीत आहे. डॉक्टर पथकाच्या भेटीत 7 गरोदर माता आणि त्यापैकी दोघी जोखमीच्या अवस्थेत होत्या. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु झाल्याचे त्यात म्हटले आहे.

- Advertisement -

अलिबाग परिसरात अनेक बालके कुपोषित जन्माला येतात. अशा सुमारे 700 पेक्षा जास्त बालकांचे कुपोषण कमी करण्यात अलिबाग जिल्हा रुग्णलयाला यश आले आहे. रुग्णालयात यासाठी विशेष कक्ष कार्यरत आहे. डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या पथकाने याकामी विशेष प्रयत्न केले. सरकारी आरोग्यसेवेत उणिवा आणि गैरसोयी असू शकतील. त्याबद्दल टीकाही केली जात असेल. तथापि परिस्थिती आहे तशी स्वीकारून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न या सर्वांनी केला असावा. सरकारी योजनांचा गाभा जनकल्याण असतो हे लक्षात घेतले असेल. त्याची दखल माध्यमांनीही घेतली. सार्वजनिक आरोग्यसेवेला मानवी चेहरा देण्यासाठी असे प्रयत्न उपयोगी पडू शकतात. आरोग्यसेवेला मानवी चेहर्‍याची नितांत गरज असते. कारण असंख्य गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या सेवेवर अवलंबून असतात. काम करताना त्यांचा विचार केंद्रस्थानी ठेवणारी उदाहरणे इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतील.

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ ऑगस्ट २०२६ – कोणाच्या हितासाठी ही मुस्कटदाबी?

0
Daily Deshdoot Editorial 28 August 2026 अंगणवाडी ही केवळ चार भिंतींआड चालणारी लोककल्याणकारी शासकीय योजना नाही, तर ती देशाच्या भावी पिढीच्या आरोग्याचा पाया आहे, असे...