हवामान बदलावर जागतिक पातळीवर संशोधन सुरू आहे. त्यावर सातत्याने जागतिक परिषदा पार पडतात. हा जागतिक मुद्दा असल्याने सर्व देश एकत्रित येऊन उपाययोजनांचा आराखडा ठरवताना आढळतात. देशांच्या सक्रिय सहभागावर जोरदार चर्चा होते. त्याचे वृत्तांकन माध्यमे सातत्याने करतात. हा मुद्दा त्यांच्याही प्राधान्यक्रमावर आढळतो. तज्ज्ञही जागतिक सहभागावरच जोर देतात आणि उपायही सुचवतात.
उदाहरणार्थ हवामान बदल यावर सुरू असलेले प्रयोग प्रयोगशाळेपुरते मर्यादित राहू नयेत. त्याला प्रत्यक्ष प्रमाणांची जोड असावी. शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात परस्पर सहयोग असावा. हवामान बदलला तोंड देतील अशा पिकांच्या जाती तयार व्हाव्यात आणि त्या प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी त्याला धोरणांची साथ असावी हे त्यापैकी काही उपाय. सामान्य लोकही त्यात त्यांचा खारीचा वाटा नक्की उचलू शकतील.
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या अशा विविध पातळ्यांवरील प्रयत्नांपासून माणसे आणि विशेषतः शेतकरी स्वतःला फारकाळ अलिप्त ठेऊ शकतील का? हवामान बदलाचे चांगले-वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतात. त्यामुळे त्यांच्या पातळीवर ते काय करू शकतात हेही लक्षात घेतले जाण्याची गरज आहे. त्यासंदर्भात कुठे कुठे काय काय प्रयोग सुरू आहेत, प्रत्यक्ष शेती करताना आणि हवामान बदलाचा सामना करताना तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकेल याची माहिती घेता येऊ शकेल.
युवा शेतकरी त्यात मोलाची भूमिका बजावू शकतील. उदाहरणार्थ, राहुरी कृषी विद्यापीठात ‘क्लायमेट स्मार्ट’ प्रकल्प राबवला गेला. त्यात शेतीत विविध तंत्रज्ञानाचा म्हणजे ए.आय., रोबोटिक्स, ड्रोन, पारंपरिक ऊर्जा आणि इतर यांचा वापर यावर भर दिला गेला. त्याच्या प्रतिकृती (मॉडेल्स) तयार झाल्या आहेत. त्याचा उपयोग करून घेऊन पिकांवर कोणते रोग येऊ शकतील, पाऊस येण्याची शक्यता असू शकेल का याचे अंदाज शेतकरीदेखील त्यांच्या पातळीवर घेऊ शकतील, असे तज्ज्ञ सांगतात.
गावागावांत सामूहिक पातळीवर ऑटोमॅटिक व्हेदर स्टेशन उभारले जाऊ शकतील. त्याच्या मदतीने रोजच्या तापमानाचे विश्लेषण करणे युवा शेतकर्यांना शक्य होऊ शकेल. त्यातून बदलांचा अंदाज येऊ शकेल आणि परिणामांना सामोरे जाण्याची किंवा उपाययोजनांसाठीची मानसिकता तयार होऊ शकेल. याबाबतीत लोकांनाही त्यांच्या पातळीवर जागरुक व्हायला हवे. हवामान बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी दैनंदिन जगणे अधिकाधिक पर्यावरणपूरक करावे लागेल. याची खूणगाठ लोकांनी आताच मारलेली बरी.