पुणे | Pune
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडले आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik karad) यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडत स्पष्टपणे भाष्य केले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, “पुरावा नसताना कोणावर आरोप करणे कितपत योग्य आहे. न्यायालयाची चौकशी सुरु असून या प्रकरणात एसआयटी, सीआयडी तपास करत आहेत.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल. आरोपी सापडायला वेळ लागला, मात्र महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत”, असे त्यांनी म्हटले.
तसेच बीड प्रकरणात मी स्वता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटलो आहे. या संदर्भात पक्ष न बघता जर कुणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील तर कुणाचीही गय करू नका. मुख्यमंत्रीही त्या मताचे आहेत. प्रत्येकाची चौकशी करून किती फोन झले, कुणाचे किती फोन कुणाला आले यावर बारकाईने लक्ष दिले जात आहे. तितक्याच गांभीर्याने सरकारने (Government) या प्रकरणावर लक्ष दिले आहे. विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी काय बोलायचे याचे अधिकार दिले आहेत. पण कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे,असेही अजित पवारांनी म्हटले.