मुंबई | प्रतिनिधी Mumbai
गडचिरोलीच्या भूमीवर सी-६०, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ४४ नक्षल स्मारके उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. जवानांच्या या कामगिरीचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाच्या मुळांवर निर्णायक प्रहार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
गडचिरोली पोलीस दल, सी-६० दलातील कमांडो आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त मोहिमेंतर्गत १८ पथके आणि ८०० जवानांची धडक कारवाई यामुळे नक्षलवाद्यांनी उभारलेली ४४ स्मारके एकाच दिवशी भुईसपाट करण्यात आली. या कारवाईवर फडणवीस यांनी गुरुवारी एक्स या समाज माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
ही कारवाई केवळ काही बांधकामे पाडण्यापुरती मर्यादित नसून नक्षलवादी दहशत आणि हिंसाचाराला मुळापासून चिरडण्याचा ठाम संदेश आहे. गडचिरोलीच्या भूमीवर नक्षलवाद्यांची कोणतीही निशाणी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच शांतता, विकासाच्या मार्गावर ठामपणे पुढे जाण्यासाठी सुरक्षा यंत्रणा पूर्ण ताकदीने सज्ज आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल प्रत्येक आघाडीवर कटिबद्ध असून नक्षलवादाच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.




