नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ( Delhi Assembly Elections) ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान (Voting) पार पडले होते. या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. एकीकडे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची अटक, सुटका आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर आम आदमी पक्षानं सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असताना दुसरीकडे काँग्रेसकडून प्रचारासाठी दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं होते. या दोन्ही पक्षांसमोर यंदा भारतीय जनता पक्षाचं कडवं आव्हान होतं. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते.
आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला (Counting of Votes) सुरुवात झाल्यापासून पोस्टल मते आणि ईव्हीएम यंत्रांमधील मतांच्या मोजणीत भाजपने वरचष्मा राखला आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अरविंद केजरीवाल, आतिशी, मनिष सिसोदिया यांनी एकदाही आघाडी घेतलेली नाही. हा ‘आप’साठी (AAP) धोक्याचा इशारा मानला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतिशी आणि मनिष सिसोदिया यांच्यासारखे राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेले चेहरेही पराभवाच्या छायेत दिसत आहेत.
मतमोजणीच्या सध्याच्या कलानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण ७० जागांपैकी भाजप ४९, आप १९ आणि काँग्रेस (Congress) पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. विशेष बाब म्हणजे दिल्लीतील अनेक मुस्लीमबहुल भागांमध्येही भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत भाजपला विजय मिळाल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कैकपटींनी वाढणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघात पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या संदीप दीक्षितही पिछाडीवर आहेत. तर कालकाजी मतदारसंघात ‘आप’चा प्रमुख चेहरा असलेल्या आतिशी या पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे आक्रमक नेते रमेश बिधुडी आघाडीवर आहेत. तर जंगपुरा मतदारसंघात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे तरविंदर सिंह मारवा आघाडीवर आहेत.