नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी ‘आम आदमी पक्षा’चा झाडून पराभव केला असून आपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणूक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) दिल्लीतील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,”आज दिल्लीच्या (Delhi) जनतेने स्पष्ट निर्देश दिले असू जनतेने डबल इंजिन सरकारकडे आपला कल दिला आहे. जी लोक दिल्ली आपल्या मालकीची असल्याचे सांगत होते, त्यांना जनतेने दाखवून दिले की दिल्लीचे खरे मालक फक्त आणि फक्त दिल्लीची जनता आहे. ज्यांना दिल्लीचे मालक होण्याचा अहंकार होता, त्यांचा अहंकार या निवडणुकीत मातीमोल झाला आहे. त्यांचा सत्याशी सामना झाला असून दिल्लीच्या जनतेने दिलेल्या कौलामुळे राजकारणात शॉर्टकट अन् खोट्यानाट्यासाठी कोणतेच स्थान नाही, हे स्पष्ट केले आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,” दिल्लीतील जनतेने शॉर्टकटवाल्या राजकारणाचे शॉर्टसर्किट केले आहे. दिल्लीच्या जनतेने लोकसभेत भाजपला (BJP) कधीच निराश केले नाही. २०१४, २०१९, २०२४ तिन्ही निवडणुकीत दिल्लीच्या लोकांनी भाजपला सातच्या सात जागांवर विजयी केले आहे, त्यामुळे मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो. दिल्लीने मनापासून आमच्यावर फ्रेम केलं. दिल्लीकरांना मी हा विश्वास देऊ इच्छितो की तुमचं प्रेम विकासाच्या रुपाने तुम्हाला परत देऊ. दिल्लीकरांनी आम्हाला प्रेम दिलं, विश्वास दाखवला. हे कर्ज दिल्लीचं डबल इंजिन सरकार चुकवणार. आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे. दिल्लीकरांनी ‘आपदा’ घालवली. यापासून दिल्ली मुक्त झाली आहे”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
तसेच “दिल्लीच्या तरुणांनी (Youth) आम्हाला साथ दिली आहे. दिल्लीत आज लागलेला निकाल हे दाखवून देतो आहे की भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाचा किती विश्वास आहे. लोकसभेतल्या विजयानंतर आम्ही सर्वात आधी हरियाणात अभूतपूर्व विजय मिळवला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा रेकॉर्ड केला, आता दिल्लीत नवा इतिहास रचला गेला आहे असंही मोदी म्हणाले आहेत. आपलं दिल्ली हे काही फक्त शहर नाही तर मिनी हिंदुस्थान आहे. दिल्ली हा लघुभारत आहे. दिल्ली एक भारत, श्रेष्ठ भारत हा विचार घेऊन जगणारं शहर आहे”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.