नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकारी टीमवर्कनुसार काम करीत असल्याचे गौरवोद्गार काढले.
या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार किशोर दराडे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामकालपथ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मोनोरेलचाही आढावा घेतला.
आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा शून्य अपघात, सुखद आणि अध्यात्मिक होण्यासाठी तसेच नाशिक शहराला जागतिक पातळीवर आणून अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कुंभमेळ्यासाठीच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जात असल्याचे सांगितले.
आ. फरांदे यांनीही विविध सूचना केल्या, तर महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
गोदावरी स्वच्छतेसाठी स्वतंत्र निधी
गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारण, जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तातडीने तरतुद केली जाईल.साधूग्रामच्या भूमी अधिग्रहणातत्याठिकाणी जागा असलेल्या शेतकर्याशी चर्चा करुन त्यांच्या संमतीने पूढे जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.