मुंबई | Mumbai
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज संध्याकाळी ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. याआधी दोन वेळा त्यांनी हे पद भूषवले आहे. २०१४ साली भाजप शिवसेनेच्या युतीत त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भुषवले त्यानंतर मात्र अवघ्या ७२ तासांसाठी ते पदावर होते. त्यामुळे सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी असणारे नेते ही नोंदही त्यांच्यानावे झाली आहे. पण यंदा भरभक्कम बहुमताच्या जोरावर पूर्ण कार्यकाळ पदावर राहण्यासाठी फडणवीस सज्ज झाले आहेत. फडणवीसांचा तिसरा कार्यकाळ कसा असेल याबाबत त्यांनी एका मुलाखतीत सुचक वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बदल्याच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे. त्यांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला आहे. मी स्वल्प काय अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो.आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, अशी टीका त्यांनी ठाकरे-पवारांवर केली. त्याचसोबत महायुतीवर, भाजपवर आणि माझ्यावर जनतेने मोठा विश्वास विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर सडेतोड उत्तर दिले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
गेल्या अडीच वर्षांत विरोधकांकडून पातळी सोडून आपल्यावर टीका झाली, पण आता ते सगळे विसरून काम करणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे. २०२२ च्या सत्तांतरानंतर फडणवीसांनी भर विधानसभेत बोलताना विरोधकांना माफ करून त्यांचा बदला घेणार असल्याचे विधान केले होते. याहीवेळी विरोधकांना माफी हाच आपला बदला असणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
तसेच नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात आर्थिक शिस्तीसाठी अनेक योजनांना कात्री बसणार असल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात आर्थिक शिस्तीची नक्कीच गरज आहे. त्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना आणि अल्पकालीन उपाययोजना अशा दोन्ही पातळ्यांवर काम करावे लागेल, असे फडणवीसांनी सांगितले.
आर्थिक शिस्त म्हणजे लोकाभिमूख योजनांना कात्री लावणे, असा अर्थ होत नाही. त्या सुरु ठेवण्याबरोबरच राज्याचे उत्पन्न वाढणे,औद्योगिक गुंतवणुकीसह विविध क्षेत्रात राज्य अव्वल स्थानी ठेवणे हे महत्वाचे आहे.खर्च, उत्पन्नाचे अचूक भान ठेवत आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.