नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
UGC-NET जून 2026 परीक्षेतील प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA)ने घेतला आहे. या निर्णयानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि NTAवर जोरदार टीका केली. “मोदीजी, तुमच्या NTA ने काय केले ते पाहा”, अशा आशयाची प्रतिक्रिया देत त्यांनी परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले.
राहुल गांधी यांची सरकारवर टीका
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी UGC-NET परिक्षेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहेस ज्यानंतर आता नेट फेरपरीक्षा होणार असल्याने याबाबत राहुल गांधींनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मोदीजी, तुमच्या एनटीनएने काय केले आहे बघा. यूजीसी नेटच्या इंग्रजी, समाजशास्त्र आणि कॉमर्स विषयांच्या परीक्षा २२ ते ३० जूनच्या दरम्यान घेण्यात आल्या. त्यानंतर आता साधारण दोन महिने झाल्यावर या परीक्षा रद्द करण्यात आल्या कारण त्यांच्याकडून म्हणजे एनटीएकडून चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. जुन्या प्रश्नांचीच पुनरावृत्ती त्यामध्ये होती. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारी केली होती. अर्ज भरले, फी भरली, दूरवर असलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊन पेपर दिले. आता त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा हा सगळा त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय दिलेला पेपर रद्द झाला याचा मनस्तात कसा भरुन काढणार? एनटीएने चूक केली आणि शिक्षा विद्यार्थ्यांना का? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
तुमचे पैसे, तुमची वर्षे, तुमची मेहनत, तुमचे मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास सगळं काही हिरावून घेते
तसेच, त्यांनी पुढे लिहिले आहे की, कोटामध्ये, डेहराडूनमध्ये, प्रयागराजमध्ये मी हे सांगितले आहे तसेच पुढेही सांगत राहीन. की देशात आता शिक्षण व्यवस्था अशी काही राहिलेली नाही. हे एक एक्स्ट्रॅक्शन मशीन झाले आहे. तुमचे पैसे, तुमची वर्षे, तुमची मेहनत, तुमचे मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास सगळं काही हिरावून घेते. त्या बदल्यात काहीच मिळत नाही. नोकरीही मिळत नाही, असे लिहित राहुल गांधींनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. परीक्षा होण्यापूर्वी या प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या का याचे उत्तरही एनटीएने दिलेले नाही की परीक्षेपूर्वी या प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या का? मोदी सरकारच्या इतर प्रत्येक विभागाप्रमाणेच, एनटीएदेखील ही आपली चूक आहे असे कधीच मान्य करत नाहीये. इतर प्रत्येक गैरप्रकार झालेल्या परीक्षांप्रमाणेच, मला पूर्ण खात्री आहे की येथेही कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही, अशा शब्दात राहुल गांधींनी निशाणा साधला.
नेमकं प्रकरण काय?
सहाय्यक प्राध्यापाक आणि पीएचडी अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाते. २२ ते ३० जून दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्याबाबतच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं समिती आढळलं. त्यानंतर तीन विषयांची परीक्षा परत घेतली जावी अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. ज्यावरुन आता राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.




