मुंबई | Mumbai
गेल्या काही काळापासून महायुती सरकारमध्ये चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची कमान शिवसेना (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत अधिकृत पत्रक काढण्यात आले आहे.
वादावर अखेर पडदा
रायगड आणि नाशिक या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील (Mahayuti) प्रमुख घटक पक्षांमध्ये बऱ्याच दिवसांपासून रस्सीखेच पाहायला मिळत होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरस निर्माण झाली होती, तर नाशिकच्या जागेसाठीही महायुतीतील नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू होते.या राजकीय तिढ्यामुळे प्रशासकीय कामे आणि नियोजनावर परिणाम होत असल्याचे चित्र होते. मात्र, वरिष्ठांच्या बैठकीनंतर आणि समन्वय साधल्यानंतर अखेर हा वाद पूर्णपणे निवळला आहे.
जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार
नव्या नियुक्तीमुळे दोन्ही जिल्ह्यांमधील प्रशासकीय समन्वयाला बळ मिळणार असून रखडलेल्या विकासकामांना वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि स्थानिक प्रश्नांवर आता मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कामे वेगाने मार्गस्थ होतील. तर रायगडमध्ये कोकणातील पायाभूत विकास, रस्ते, पर्यटन आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री भरत गोगावले ॲक्शन मोडमध्ये काम करतील.




