मुंबई | Mumbai
राज्यातील मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मराठी भाषेचा आग्रह आणि त्यावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत शिंदेंची पाठराखण केली असून, भाषेच्या नावावर मारहाणी करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात’ अशी घोषणा केली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र, शिंदेंच्या या घोषणेनंतर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेने सडकून टीका केली. “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुठे गेले?” असा सवाल करत शिवसेनेने शिंदेंवर जोरदार निशाणा साधला.
याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत शिंदेंची पाठराखण केली आहे. “कोणत्याही समाजाच्या कार्यक्रमात गेले असताना त्यांच्या गौरवासाठी काही घोषणा दिल्या जातात. त्याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीचे आपल्या राज्यावरचं प्रेम कमी झालं,” असं म्हणत फडणवीसांनी या टीकाकारांना उत्तर दिलं. तसेच शरद पवार यांच्या जुना संदर्भ देत सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना शरद पवार यांनी ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली होती. मग त्यांचा कर्नाटकावर प्रेम जास्त आहे का? या तर्काने वागत गेलो तर मराठी माणसाची विचारसरणी संकुचित होईल.”
फडणवीसांनी पुढे सांगितले की, “मराठी माणूस अटकेपार झेंडा फडकवणारा आहे. त्याने दिल्लीपर्यंत सत्ता गाजवली आहे. मराठी माणूस ही संकुचित मानसिकता बाळगणारा नाही. ‘जय गुजरात’ म्हटल्यामुळे कोणी मराठीद्रोही ठरत नाही.”
मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केलं की, “महाराष्ट्रात राहून मराठी शिकणं, बोलणं आवश्यक आहे, हा आग्रह चुकीचा नाही. पण केवळ भाषेच्या मुद्द्यावरून कोणत्याही नागरिकाला मारहाण करणं अत्यंत गैर आहे. आपले मराठी व्यावसायिक देशभरातील विविध राज्यांमध्ये व्यवसाय करतात. तिथे त्यांना स्थानिक भाषा येत नसेल, तर त्यांना कुठे मारहाण होते का?” याच पार्श्वभूमीवर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाणीच्या घटनेमुळे कायदा हातात घेतल्याचं स्पष्टपणे सांगत, “गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा फडणवीसांनी मनसेला दिला.





