Thursday, July 30, 2026
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा, नेमकं...

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा, नेमकं कारण काय?

मुंबई । Mumbai

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने राजकारण आणि समाजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी जाहीर केला होता.

- Advertisement -

डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण विश्रांती घेत उपचार सुरू ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. 1 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली आणि अद्याप उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. या दरम्यान, त्यांनी महायुती सरकारवरही जोरदार टीका केली होती.

संजय राऊत यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, तब्येत सुधारत असली तरी पूर्ण बरे होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे. “मी घर आणि रुग्णालयाच्या कैदेत आहे. उद्धव ठाकरे माझ्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. उपचार कठीण आहेत, आजारापेक्षा उपचार जास्त त्रासदायक असतात,” असे त्यांनी सांगितले होते. डिसेंबरनंतर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

याचदरम्यान, दोन दिवसांच्या शांततेनंतर संजय राऊत पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण, संजय राऊत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका कार्यक्रमात अनपेक्षित भेट झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा चांगलाच जोर चढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात ही भेट झाली. कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेचे नेमके स्वरूप काय होते, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.

या कार्यक्रमाला भाजपा नेते आणि मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार देखील उपस्थित होते. त्यामुळे, फडणवीस यांनी राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली का किंवा दोन्ही नेत्यांमध्ये आगामी राजकीय परिस्थिती, निवडणुका किंवा इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली का, याबद्दल विविध तर्कवितर्क सुरू आहेत. विशेषतः राऊत यांनी नुकतीच राज्य सरकारवर केलेली टीका लक्षात घेता, ही भेट अधिकच चर्चेची ठरली आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या लग्नाला उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. मात्र, त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय समीकरणांमध्ये काही बदल होणार का, किंवा ही केवळ औपचारिक भेट होती का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वातावरण तापलेल्या पार्श्वभूमीवर ही भेट अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली असून, पुढील काही दिवसांत या संदर्भातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....