ओझे | Oze
ढकांबे परिसरातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी जोरदार मागणी करत आपली व्यथा मांडली. शेतकऱ्यांनी सांगितले की, ढकांबे गावातील जमिनींचा सध्याचा बाजारभाव सुमारे ४ कोटी रुपये प्रति एकर इतका असताना शासनाकडून केवळ दीड कोटी रुपयांचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेत मंत्री महाजन (Girish Mahajan) यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मोबदला वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. “शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, योग्य तो न्याय मिळवून देऊ,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या यावेळी नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्र जाधव, तसेच ढकांबे गावातील प्रगतिशील शेतकरी दौलतराव बोडके, संजय सानप आणि इतर रिंगरोड बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्र्यांच्या या थेट भेटीमुळे आणि दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये न्याय मिळण्याबाबत आशेचे वातावरण निर्माण झाले असून, आता शासनाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





