ओझे l वार्ताहर Oze
ढकांबे परिसरातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोड संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत संवाद साधला.
या भेटीदरम्यान प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, मंडळ अधिकारी पांडे सर तसेच तलाठी पूनम गोढे हे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी रिंगरोड प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या मोबदल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपली बाजू मांडली.
शेतकऱ्यांनी सांगितले की, ढकांबे गावातील संबंधित जमिनींचा सध्याचा बाजारभाव सुमारे ४ कोटी रुपये आहे, मात्र शासनाकडून केवळ दीड कोटी रुपयांचा मोबदला देण्यात येत आहे. तसेच द्राक्ष बागेसाठी प्रति झाड २२० रुपये आणि पेरू बागेसाठी प्रति झाड १६५ रुपये इतकाच मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी शासनाने योग्य बाजारभावानुसार मोबदला देऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शेतकऱ्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत हा विषय गांभीर्याने घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
तसेच हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला. या भेटीमुळे शेतकऱ्यांमध्ये न्याय मिळण्याबाबत आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.




