नाशिक । प्रतिनिधी
मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व आलेला महापूर ते बघता यंदा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशसनाने आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चार पटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
आपत्ती निवारण कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कृती आराखडा तयार करावा लागतो. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून तसा लघुकृती आराखडा तयार करून जबाबदार्या निश्चित केलेल्या आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका काही प्रमाणात जिल्ह्याला बसला आणि मान्सुनपूर्व पावसापासूनच यंत्रणेच्या कामाला सुरूवात झाली. पावसाळ्यात आपत्तीचा सामना जिल्ह्याला करावा लागतो.
पूरपरिस्थिती, अतिवृष्टी, गारपीट आणि त्यामुळे होणारे मालमत्तेचे आणि जिविताचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाला तत्पर रहावे लागते. आपत्ती निवारणार्थ जिल्ह्याची तयारी, साधन सामुग्रचीचा तपशील, अशा आपत्तीच्या वेळी उपयोगी ठरतात. आपत्तीच्या काळात नेमका संपर्क आणि जबाबदारी कुणाकडे आणि त्यांना कारावे लागणार याचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
या आराखड्यानुसार जिल्ह्यातील यंत्रणेला आपली जबाबदारी ओळखून तत्पर मदतकार्य आणि घटनास्थळी उपस्थित अधिकार्यांनी आपत्ती निवारणाचे कामकाज करणे सुलभ होते.
पाणी विसर्ग करावे लागेल
गंगापूर धरण समुहात सद्यस्थितीत ३४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी हा साठा अवघा १२ टक्के इतका होता. तर जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये गतवर्षी अवघा ९ टक्के पाणीसाठा असतांना यंदा हाच साठा ३१ टक्के इतका असल्याने यंदा धरणामधून लवकरच पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येणार आहे.
आपत्ती परिस्थितीत काय कार्यवाही करावी याबाबत अत्यंत स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहेत. आपत्ती टाळता येत नसली तरी आपत्तीमुळे होणारे नुकसान निश्चितपणे टाळता येते व त्यामध्ये हा लघु कृती आराखडा सर्व अधिकार्यांना निश्चितपणे मदत करेल.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी




