नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिक्षण विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयातून (Nashik Divisional Office) झालेल्या शालार्थ घोटाळ्यातील दुसऱ्या गुन्ह्याच्या खटल्याला अखेर सुरुवात झाली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) नाशिकरोड न्यायालयात (Nashik Road Court) ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर शुक्रवारी (दि. ३) या प्रकरणातील पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान प्रमुख संशयितांची न्यायालयात हजेरी लागली असून, हे प्रकरण आता सत्र न्यायालयात वर्ग होणार आहे.
पहिल्या सुनावणीत (First Hearing) राज्य शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष आणि मुख्य संशयित नितीन उपासनी याच्यासह राहुल पवार यांनी कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लावली. तर दुसरा संशयित किरण पाटील हा न्यायालयात प्रत्यक्ष हजर होता. या प्रकरणाची व्याप्ती आणि गुन्ह्याचे गांभीर्य पाहता, हे प्रकरण आता सत्र न्यायालयात वर्ग करण्याच्या प्रक्रियेसाठी आगामी मंगळवारी (दि. ७) पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता संपूर्ण शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलिसांत (Nashik Road Police) दाखल झालेल्या या दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीचे प्रमुख तथा सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या पथकाने सबळ पुराव्यांसह अकराशे पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीत संशयितांच्या उपस्थितीनंतर आता या खटल्याच्या पुढील वर्गवारीची आज औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. या गुन्ह्यात उपासनी, किरण पाटील व राहुल पवार यांना अटक झालेली असून, उपासनी अद्यापही कारागृहातच आहे.
१६० कोटींचा अपहार
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नेमलेल्या एसआयटीच्या तपासानुसार, या संपूर्ण रॅकेटमध्ये तब्बल १६ संशयितांविरुद्ध सबळ पुरावे हाती आले आहेत. दोषारोपपत्रात उदय पंचभाई, राजमोहन शर्मा, प्रवीण अहिरे, मनीष पाटील, शरद शिंदे, अविनाश उर्फ पप्पू पाटील, मनोज पाटील, उमेश पवार, अतुल पवार, प्रदीप शिंगणे या प्रमुख संशयितांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रातील २३३ शाळांमधील ८२१ शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, सचिव आणि शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह तब्बल १,१९९ संशयित निष्पन्न झाले.




