अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील लालटाकी परिसरातील लक्ष्मीआई जत्रेमध्ये म्हशी पळवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेत चार जणांच्या टोळक्याने तिघांना लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत गोरख बहिरट (वय 27, रा. गवळीवाडा, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणय जाधव (जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी), सागर बारसे (रा. रेल्वे स्टेशन रस्ता, गवळीवाडा), शेखर तांबे, रोहित शिंदे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनिकेत गोरख बहिरट हा तरूण आपल्या भावासह आणि मित्रासह जत्रेला लालटाकी येथे गेला होता. तेथे संशयित आरोपी प्रणय जाधव, शेखर तांबे, रोहित शिंदे आणि सागर बारसे यांच्याशी त्यांचा किरकोळ वाद झाला.
हा वाद मिटल्याचे भासवून संशयित आरोपींनी अनिकेत, त्याचा भाऊ आदित्य आणि मित्र पवन तोरडी यांना चहा पिण्यासाठी बालिकाश्रम रस्त्यावरील एका गोठ्यावर बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे हे तिघे तिथे गेले असता, संशयितांनी त्यांना घेराव घातला. तुम्ही आमच्याशी वाद का घातला? असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यावेळी प्रणय जाधव आणि रोहित शिंदे यांनी लोखंडी रॉडने अनिकेतच्या डोक्यात आणि हातापायावर गंभीर वार केले. तसेच आदित्य आणि पवन यांनाही लाथाबुक्क्यांनी आणि रॉडने केली. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.




