अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने देखील इंधन बचतीसाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. या उपाययोजनानुसार नगर जिल्ह्यात आता शासकीय बैठका आता ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. यानूसार आज शुक्रवार (दि.15) रोजी जिल्हा नियोजन समिती व खरीप हंगाम नियोजनाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून ही बैठक ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विविध आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशानूसार जिल्ह्यात शासकीय विभागाच्या बैठका आता ऑनलाईन पध्दतीने व्हीसीव्दारे काढण्यास सांगण्यात आले आहे. तसेच दैनदिन वापरासाठी बाह्यस्त्रोताव्दारे इलेक्ट्रीक वाहने वापरण्यास प्राधान्य देण्यात यावे, कार्यालयीन कामानिमित्त नियोजित स्थळभेटी दरम्यान, कमीत कमी वाहनांचा वापर करावा, अधिकार्यांनी एकत्रित करपुलींगद्वारे प्रवास करण्यात यावा. वरिष्ठ अधिकार्यांनी देखील आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.
कार्यालयीन कामासाठी नैसर्गिक प्रकाशाचा वापर करावा. अनावश्यक विद्यूत दिव्यांचा वापर टाळण्यात यावा. प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत जास्तीजास्त सौर उर्जेचा वापर करावा, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन द्यावे, युरियाचा गैरवापर टाळण्यासाठी माती परीक्षणसोबत खतांचा वापर तर्कसंगतपध्दतीने करावा, यासह अन्य सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानूसार नगर जिल्ह्यात आज पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थित होणारी जिल्हा नियोजन समितीची व खरीप हंगाम पूर्व नियोजनाची बैठक ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
रॅलीसाठी वाहनांना बंदी
यापुढील काळात नगर जिल्ह्यासह राज्यात पोलिस विभागाने कोणत्याही कारणासाठी दुचाकी फेर्या, वाहनाच्या मिरवणूका आणि वाहनांचा ताफाच्या रॅलीसाठी परवानग देवू नयेत, असे राज्य सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे.





