Thursday, May 2, 2024
Homeशब्दगंधकेवळ संपत्ती नव्हे, स्वास्थ्यही निर्माण करा : सद्गुरू

केवळ संपत्ती नव्हे, स्वास्थ्यही निर्माण करा : सद्गुरू

जगात आपल्याला फक्त संपत्ती निर्माण करण्याची गरज नाही. आपल्याला स्वास्थ्य सुद्धा निर्माण करण्याची गरज आहे. संपत्ती ही मानवी सुख समृद्धी निर्माण करण्यासाठी केवळ एक साधन आहे, ते काही आपलं अंतिम लक्ष नाही. पण आज लोक त्याच्या मागे असे काही लागले आहेत जणू तो एक धर्मच आहे. आपण पैशालाच देव बनवले आहे आणि अविरतपणे आपण त्याचा पाठलाग करतो आहोत. पैसा हे केवळ एक साधन आहे, ते काही आयुष्याचं अंतिम लक्ष नाही. आपण आपल्या सोयीसाठी तो निर्माण केला आहे. पण धन-दौलतीचा पाठलाग करत असताना, आपण ज्या ग्रहावर जगतो आहोत, त्याचाच विनाश आपण करत आहोत. संपत्ती निर्माण करण्याचा विचार करण्याऐवजी, आपण जर मानवी कल्याणाचा विचार केला, तर फक्त आपल्याला जितकं आवश्यक आहे केवळ तितकंच आपण करू.

संपत्ती बद्दलची आपली धारणा आणि कल्पना आपण तपासून घ्यायला हवी. संपत्ती म्हणजे केवळ अधिक ईमारती. अधिक यंत्रे, अधिक कारगाड्या, आणि अधिक सर्वकाही असे आहे का? अधिकाअधिक म्हणजे मृत्यू आहे. जगातील सर्वात संपन्न समाजांमध्ये, उदाहरणार्थ यूरोपियन समुदायामध्ये, जवळजवळ 40% लोकं मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत. तुम्ही जर बाजारातून फक्त औषधे काढून घेतलीत, तर जवळजवळ अर्धा युरोपखंड वेडा होईल. याला समाधान, संपन्नता असे म्हणता येणार नाही. सामान्यतः यूरोपियन नागरिकांकडे ज्या सुखसोई आहेत त्याची इच्छा इतर कुणीही सहज केली असती. तिथे सुख-सोई, संपत्ती आहे पण समाधान, स्वाथ्य-संपन्नता मात्र नाही. मग या संपत्तीचे तुम्ही काय करणार आहात?

- Advertisement -

मी जेव्हा अमेरिकेत असतो, जेव्हा मी त्यांना विचारतो, तुम्ही ध्यान का करत नाही? तेंव्हा प्रत्येक ठिकाणी सामान्यतः असे उत्तर मिळते की, पण आम्हाला आमचे क्रेडीट कार्डचे खर्च भागवायचे आहेत. मग मी त्यांना म्हणतो, तुम्हाला येवढे खर्च का असतात? जर तुमचे संपूर्ण आयुष्य खर्च भागवण्यातच जाणार असेल, तर येवढा खर्च करायचा तरी कशाला? तुम्ही तुमच्या गरजा कमी करून तूमचे आयुष्य अधिक आरामात जगू शकत नाही का? तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अविरतपणे धडपडत आहात. याला काय अर्थ आहे? नाही, संपूर्ण समाजच असे करतो आहे. काही हरकत नाही. ते इतरजण करत आहेत म्हणून तेही त्याच्या मागे लागले आहेत. तुम्हाला जर थोडीशी समज असेल, तर तुम्ही तेवढाच खटाटोप केला पाहिजे जेवढं तुम्हाला सोयीस्कर वाटेल. तुम्ही इतर कोणी काय करते आहे ते करण्याच्या भानगडीत पडू नका. हा जीवनाकडे पाहण्याचा चुकीचा मार्ग आहे.

जेव्हा बाह्य जगात कार्य क्षमता, कौशल्याचा विचार येतो, तेव्हा कोणतीही दोन माणसे कौशल्य आणि क्षमतांच्या दृष्टिकोनातून एक समान उपजत प्रतिभाशाली नसतात. आपल्या स्वतःचा आणि भोवतालच्या वातावरणाचा विध्वंस न करता; कितपत बाह्य घडामोडी किंवा आंतरिक स्वास्थ्य किंवा सामाजिक संपन्नता आपले जीवन संतुलित ठेवेल हे आपण ठरवण्याची गरज आहे. दुर्दैवाने ही समज आणि संवेदनशीलता आज जगात आढळून येत नाही. आपण विचार न करता, अनिर्बंधपणे धरती मातेला विनाशाच्या खाईत ढकलत आहोत. आपण ज्या मार्गाने पुढे जात आहोत तो मार्ग विनाशकारी आहे कारण जगाने जी जीवनशैली निवडली आहे ती काही साम्प्रून जीव सृष्टीच्या हितावह आणि परवडणारी नाही. ती मोडून पडणार हे नक्की आणि आपल्याला अतिशय दुःखी, कष्टी मार्गांनी धडा शिकावा लागणार आहे. एकतर आपण स्वतःहून यात तातडीने सुधारणा करायला हवी नाहीतर निसर्गच ही चूक अतिशय क्रूरपणे सुधारेल. आज आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत एकतर विवेकबुद्धीने जगणे किंवा विवेकशून्य, मूर्खासारखे जगणे. पर्याय दारिद्र्य आणि संपत्ती हा नाहीये. आपल्या गरजा जाणून त्यांची पूर्तता समजूतदारपणे करणे किंवा बेजबाबदारपणे करणे हा एकच पर्याय आपल्याजवळ आहे.

– सद्गुरू, ईशा फाऊंडेशन

(एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते 4 अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट – सेव्ह सॉइल (माती वाचवा) या जगातील सर्वात मोठ्या लोकचळवळीचे संस्थापक देखील आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या