नाशिक | प्रतिनिधी
तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून शहरातील वातावरण पुन्हा तापले असून मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला थेट इशारा दिला. “झाडे तोडण्याची एवढी घाई का आहे, याचे स्पष्ट उत्तर द्या. तोपर्यंत एकही झाड कापू नये,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
तपोवन येथे सुरू असलेल्या पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे गुरुवारी (दि.१२) नाशिक दौऱ्यावर आले. हुतात्मा स्मारक येथून निघालेल्या मोर्चात सहभागी होत त्यांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे धडक दिली. सकाळी सुमारे ११ वाजून दहा मिनिटांनी मोर्चा मनपा मुख्यालयात पोहोचला. मात्र आयुक्त उपस्थित नसल्याने महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्याशी आंदोलनकर्त्यांची चर्चा झाली.
मनसेच्या काळात कुंभमेळा पण त्यावेळी…
यावेळी बोलताना ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली तपोवनातील मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा प्रस्ताव मांडला जात असल्याचा आरोप केला. यापूर्वी मनसेची सत्ता असतानाही नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडला; मात्र त्या वेळी तपोवन परिसरातील झाडांना हातही लावण्यात आला नव्हता, असे त्यांनी नमूद केले.
अंतिम निर्णय आयुक्तांच्या अधिकारात
महापौर हिमगौरी आडके यांनी या विषयावरील अंतिम निर्णय आयुक्तांच्या अधिकारात असल्याचे सांगत सर्व संबंधितांशी चर्चा व्हावी यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर ठाकरे यांनी समितीसाठी ११ जणांची नावे देण्याची तयारी दर्शवली. समितीची बैठक होईपर्यंत झाडतोडीवर पूर्णपणे स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘निर्णयाची जबाबदारी नेमकी कोणाची?’
“मी आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो; मात्र तेच उपलब्ध नाहीत. महापौर म्हणतात हा निर्णय आयुक्तांचा आहे. मग नागरिकांनी नेमके कोणाकडे जावे? हे चित्र निवडणूक आयोगासारखे वाटते – एकजण दुसऱ्याकडे पाठवतो,” अशी उपरोधिक टीका अमित ठाकरे यांनी केली. येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीसाठी आपण पुन्हा नाशिकला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत पर्यावरणप्रेमींसह मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली. चर्चेत अमित कुलकर्णी, शीतल आडके, राजू देसले, मनोज साठे यांच्यासह मनसेचे अंकुश पवार, सुदाम कोंबडे, अमित गांगुर्डे, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.





