Saturday, July 25, 2026
HomeनगरAhilyanagar : आर्थिक गुन्हे शाखेतील अंमलदार राठोड निलंबित

Ahilyanagar : आर्थिक गुन्हे शाखेतील अंमलदार राठोड निलंबित

शेवगाव शेअर मार्केट घोटाळा || गुंतवणूकदारांकडे लाखो रूपयांची मागणी केल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शेवगाव येथील बहुचर्चित शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांनंतर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी (21 जुलै) रात्री याबाबतचे आदेश काढले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून, आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

शेवगाव येथील कोट्यवधी रुपयांच्या शेअर मार्केट घोटाळ्याची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. जादा परताव्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यानच संबंधित गुंतवणूकदारांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोप पुढे आले. गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, अंमलदार दिनेश राठोड याने वारंवार व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधला. चौकशीच्या नावाखाली नोटिसा बजावून भेटण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर, तुम्हालाही या गुन्ह्यात आरोपी केले जाईल, अशी भीती दाखवत स्वतःसह वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या आरोपांबाबत काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच या प्रकरणासंदर्भात ‘सार्वमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. संबंधित गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षकांकडून या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालात प्रथमदर्शनी आरोप गांभीर्याने घेण्याजोगे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिनेश राठोड याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

विश्वासार्हतेवर परिणाम
जिल्ह्यात अलीकडील काळात आर्थिक फसवणुकीच्या अनेक मोठ्या घटना उघडकीस आल्या असून, त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांच्याकडूनच पैशांची मागणी होत असल्याचे आरोप समोर आल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई करून पोलीस दलातील शिस्त अबाधित ठेवण्याचा संदेश देण्यात आल्याचे मानले जात आहे.

ताज्या बातम्या