Saturday, June 20, 2026
Homeराजकीयपृथ्वीराज चव्हाणांचे विधान देशभक्ती नव्हे देशद्रोह; एकनाथ शिंदेंची टीका

पृथ्वीराज चव्हाणांचे विधान देशभक्ती नव्हे देशद्रोह; एकनाथ शिंदेंची टीका

मुंबई । Mumbai

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात केलेल्या एका दाव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. चव्हाणांच्या या विधानानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर तिखट शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “भारताचा पराभव झाला असे म्हणणाऱ्या काँग्रेसला देशापेक्षा पाकिस्तानचे प्रेम जास्त उतू जात आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी आपला संताप व्यक्त केला.

- Advertisement -

पुणे येथे माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगाने निषेध केला होता. त्यानंतर आपल्या शूर लष्करी जवानांनी थेट दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मात्र, काँग्रेसचे नेते लष्कराच्या या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जवानांच्या शौर्याचा अपमान करत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

यावेळी शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या कठीण काळात पंतप्रधान मोदी लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत लष्कराला आदेश दिले होते की, “रक्ताचा बदला रक्तानेच घेतला जाईल.” भारतीय सैन्यानेही अत्यंत संयम आणि कौशल्याने ही मोहीम राबवली. मिसाईल हल्ल्यांच्या माध्यमातून केवळ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले, परंतु तेथील सामान्य नागरिकांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करताना शिंदे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. लष्कराने विजय मिळवल्यानंतर अशा प्रकारचे दावे करणे हे केवळ चिंताजनक नसून देशविघातक आहे. “काँग्रेस नेत्यांच्या विधानांतून त्यांचे देशप्रेम नाही, तर पाकिस्तानबद्दलचे प्रेम दिसून येते. ते पाकिस्तानची बोली बोलत आहेत आणि हिंदुस्थानची जनता अशा लोकांना कधीही माफ करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. चव्हाणांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये आनंद साजरा केला जात असेल, तर ही बाब लज्जास्पद असल्याचेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी राहुल गांधी यांच्या जुन्या विधानांचीही आठवण करून दिली. “पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा लष्कराने कारवाई केली, तेव्हा राहुल गांधी लष्कराकडे हिशोब मागत होते. किती विमाने गेली, किती ड्रोन पाडले, युद्ध किती वेळ चालले, असे प्रश्न विचारून त्यांनी लष्कराचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला होता,” अशी टीका शिंदेंनी केली. तसेच, तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांच्यावर दबाव असल्याचे मान्य केले होते, याचा संदर्भ देत त्यांनी विचारले की, “हा दबाव नक्की कोणाचा होता? हे कृत्य देशभक्ती नसून देशद्रोह आहे.”

मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला यांसारख्या घटनांचा उल्लेख करत शिंदेंनी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारांवर निशाणा साधला. “त्यावेळी सरकारने कठोर निर्णय घ्यायला हवे होते, परंतु त्यांनी केवळ मतांचे राजकारण केले आणि देशाला असुरक्षित ठेवले. भारताची हार झाली असे म्हणणारे काँग्रेस नेते प्रत्यक्षात पाकिस्तानचा विजय व्हावा अशी आशा बाळगून आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राची जनता अशा विधानाचा धिक्कार करेल आणि योग्य वेळी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Pawanraje Nimbalkar Case : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची...

0
मुंबई | Mumbai राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड (Pawanraje Nimbalkar Case) प्रकरणाचा निकाल आज (शनिवारी) तब्बल २० वर्षांनी देण्यात आला....