मुंबई । प्रतिनिधी
‘विमल इलायची’ ची जाहीरात केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) अभिनेता शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ११ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटिशीत संबंधित जाहीरात ही ‘विमल’ पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहीरात ठरते का, याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
राज्यात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ‘विमल’ हा ब्रँड पान मसाल्याशी मोठ्या प्रमाणात जोडला गेला असून ‘विमल इलायची’च्या जाहिरातीमधून प्रतिबंधित उत्पादनाच्या ब्रँडची ओळख आणि ग्राहकांमधील आकर्षण कायम ठेवण्याचा प्रयत्न होतो का, अशी शंका एफडीएने व्यक्त केली आहे.
एफडीएने खाद्य सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मधील कलम २४, ५३ तसेच जाहीरात आणि ग्राहक संरक्षणासंबंधी विविध नियमांचा दाखला दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी कलम ५३ अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे नोटिशीत नमूद आहे. तिघांना जाहीरात थांबवून ती समाज माध्यम आणि अन्य डिजिटल माध्यमांवरून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जाहीरात करार, उत्पादनाची माहिती, जाहीरात एजन्सी, मोबदला, प्रसाराची माध्यमे आणि जाहिरातीत सहभागी होण्यापूर्वी केलेल्या कराराची कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही एफडीएने दिला आहे.
‘इलायची, सौफ अथवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली जाहिराती करून प्रत्यक्षात फ्लेवर्ड सुपारी, तंबाखू, पान मसाला आणि गुटख्यासारख्या उत्पादनांच्या ब्रँडचा अप्रत्यक्ष प्रचार करणाऱ्या जाहिरातींबाबत मी विधानसभेत आवाज उठवला होता. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी मी केली होती.
विक्रम पाचपुते
(आमदार, भाजप)




