श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील बाजारपेठेत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापार्यांनी राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर बेग आणि आपचे नेते तिलक डुंगरवाल त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. यामध्ये स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रसंगी तिलक डुंगरवाल म्हणाले, अतिक्रमण काढताना रस्त्याची रुंदी 50 फूट करण्याऐवजी 40 फूट ठेवावी. जर प्रशासनाने 50 फूट रुंदीचा निर्णय कायम ठेवला, तर अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त होतील आणि त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सागर बेग यांनी व्यापार्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकत प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर व्यापार्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघाच्या पदाधिकार्यांनी दिला. संघाच्या पदाधिकार्यांनी स्पष्ट केले की, व्यापार्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय घेतला गेला, तर आम्ही शांत बसणार नाही. मोर्चादरम्यान व्यापार्यांनी जोरदार घोषणा देत, आपला विरोध दर्शवला. स्थानिक प्रशासनाने व्यापार्यांच्या भावनांचा आदर करून त्वरित योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
व्यापार्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. घोलप यांनी व्यापार्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाच्या नियमानुसार आणि त्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल. त्यांच्या या आश्वासनामुळे व्यापार्यांना दिलासा मिळाला असला, तरी प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात सागर बेग, तिलक डुंगरवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पटारे, दत्ता खेमनर, समीर माळवे, नागेश सावंत, विकास डेंगळे, स्वप्निल चोरडिया, गौतम उपाध्ये, संजय कासलीवाल, अॅड. सुभाष जंगले, रुपेश हरकल, सचिन बाकलीवाल,जितेंद्र छाजेड, बंडू शिंदे, भैय्या भिसे, प्रदीप जाधव, अमित मुथा, उमेश अग्रवाल आदींसह स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.