
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्यात १ जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एक्स या समाज माध्यमातून केले.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो.
शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.




