नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय सिनेसृष्टीत मानाचा मानला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards 2026) हा सोहळा गेल्या 72 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा देशाची राजधानी असलेल्या दिल्लीबाहेर होणार आहे. आगामी 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा २२ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरातमधील एकतानगर (केवडिया) येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पण आता यावरून नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात १९५४ मध्ये झाली. दिल्लीतील विज्ञान भवन हे या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख ठिकाण राहिले आहे. मात्र, यंदा प्रथमच गुजरातला या प्रतिष्ठित सोहळ्याचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, ‘७२ वर्षांत प्रथमच दिल्लीबाहेर’ असा दावा पूर्णपणे अचूक नाही. १९७० आणि १९७१ मध्ये अनुक्रमे १७वा आणि १८वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला होता.
२१ नोव्हेंबर १९७० रोजी पार पडलेला १७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मद्रास (सध्याचे चेन्नई) येथील ‘युनिव्हर्सिटी सेंटेनरी ऑडिटोरियम’मध्ये आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात दिल्लीची परंपरा मोडून तो सोहळा दुसऱ्या राज्यात नेण्याची ती पहिलीच ऐतिहासिक वेळ होती. प्रादेशिक चित्रपट उद्योगाचा आणि कलाकारांचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने हा सोहळा तत्कालीन दक्षिण भारताचे प्रमुख केंद्र असलेल्या चेन्नईत आयोजित केला होता.
विरोधकांची सरकारवर टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून टीकास्त्र सोडले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे संपूर्ण देशाची संपत्ती आणि राष्ट्रीय अभिमान एकाच राज्याकडे (गुजरात) वळवत आहेत. पंतप्रधान स्वतःला देशाचे की फक्त गुजरातचे पंतप्रधान समजतात?” असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. “राष्ट्रीय पुरस्कार सोहळा हा राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो आणि त्याची एक स्वतःची परंपरा आहे. हा सोहळा मुंबई किंवा लखनऊमध्ये व्हावा अशी माझी मागणी नाही. पण, तो देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीतच झाला पाहिजे.” अशी भूमिका त्यांनी मांडली.




