Saturday, April 18, 2026
HomeनगरAhilyanagar : गणेशोत्सवात सायबर सेलची करडी नजर - महानिरिक्षक कराळे

Ahilyanagar : गणेशोत्सवात सायबर सेलची करडी नजर – महानिरिक्षक कराळे

चुकीची माहिती प्रसारित केल्यास तात्काळ कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गणेशोत्सव काळात जिल्हा पोलीस दलाने समाज माध्यमांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सायबर सेलची यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे चुकीची माहिती, संदेश, मजकूर प्रसारित करणारे लगेच शोधले जाणार आहेत. यामध्ये संदेश प्रसारित करणार्‍यांचे फॉलोअर्स, ते कोणते यूट्यूब चॅनल पाहतात, कोणाला संदेश पाठवतात याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी जिल्हा दौरा करत पोलीस अधिकार्‍यांसह गणेश मंडळांच्या बैठका घेत विविध सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी शनिवारी नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे व सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात तीन हजार मंडळांकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे. त्यातील 231 ठिकाणी एक गाव-एक गणपती संकल्पना राबवली जाईल. त्यामध्ये वाढ करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत.

जिल्ह्यात बंदोबस्तासाठी 3 हजारावर पोलीस कर्मचारी, 1500 गृहरक्षक दलाचे जवान, 6 धडक कृती दल उपलब्ध आहे. उत्सव काळात त्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान ईद-ए-मिलाद सण येत असल्याने विशेष दक्षता घेतली जात आहे, असेही कराळे यांनी सांगितले. उत्सव काळात पोलिसांच्या मदतीसाठी स्वयंसेवकही नियुक्त केले जाणार आहेत. बंदोबस्तावर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. सार्वजनिक तरुण मंडळांना मंडपावर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील रस्ते, चौकाचौकातील सीसीटीव्ही सुरू आहेत का, याची खातरजमा केली जात आहे, पोलीस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरातील रस्ते अनेक ठिकाणी खोदले जात आहेत, ते उत्सवापूर्वी पूर्ववत करण्यासाठी महापालिका आयुक्तांशी संपर्क करण्यात आला आहे, असेही महानिरीक्षक कराळे यांनी सांगितले. मंडळांनी उभारलेले फलक, झेंडा यातून तणावाच्या घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्सव काळात समाजकंटकांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी पोलीस ठाणेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 500 जणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उत्सव काळात त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिली.

ताज्या बातम्या

विरोधकांनी महिलांचा अधिकार हिसकावला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
दिल्ली | देशातील महिला शक्तीचे उडान विरोधकांकडून थांबविण्यात आले असून आमचे अथक प्रयत्न करून सुद्धा महिला आरक्षणात बदल होऊ शकला नाही. विरोधकांनी महिलांचा अधिकार...