मुंबई | प्रतिनिधी Mumbai
कांदा दर घसरणी विरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असताना आज नाशिक मध्ये आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी तर्फे कांदा दराबाबत आंदोलन करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले की, कांद्याच्या प्रश्नावर बैठक घेण्याची विनंती आपण केंद्र सरकारला केली आहे. त्यानुसार उद्या दिल्लीत बैठक होत आहे. सोमवारीच केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव साडेतीन रूपयांनी वाढवून १५ रूपयांवर नेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कांदा प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाची फडणवीस यांनी यावेळी खिल्ली उडवली. कांदा कापल्यानंतर ज्यांच्या डोळयात अश्रू येत नाहीत, अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे केवळ फोटो अपॉर्च्युनिटीसाठी चालले असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. कांद्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे.
काही लोक विनाकारण यात राजकारण करत आहेत. त्यांना आपले इतकेच सांगणे आहे की, राज्य-केंद्राने १५ रूपयाचा निर्णय घेतला आहे. तुमच्या काळात कधी हा निर्णय केला होतात का, आम्ही घेतला. कारण आम्ही संवेदनशील आहोत. बुधवारच्या केंद्रासोबतच्या बैठकीत कांद्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील,असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.




