
मुंबई | Mumbai
देशभरात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याबाबत अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत, त्याचबरोबर विरोधकांनी इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीबाबत सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे अशी भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
त्यांनी सोशल मिडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहे. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रू. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.
तसेच राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे २५% व्हॅट + ₹१०.१२ प्रति लिटर सरचार्ज लावला जातो तर डिझेलवर अंदाजे २४% व्हॅट + ₹३.०० प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून टाकावा. यामुळे आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो अशी मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.




