नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला १७ दिवस अंतराळात घालवल्यानंतर आज १४ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. तत्पूर्वी, १३ जुलै रोजी संध्याकाळी निरोप समारंभात त्यांनी १९८४ मध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी दिलेला प्रतिष्ठित संवाद पुन्हा सांगितला आणि म्हणाले, सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा. ‘ॲक्सिओम-४’ या मोहिमेंतर्गत शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) गेले आहेत. हे चार अंतराळवीर सोमवार, १४ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३५ वाजता आयएसएसवरून निघणार आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजता ते कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरण्याची अपेक्षा आहे.
या परतीच्या प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून एक संदेश दिला आहे. त्यांचा हा प्रवास अद्भूत होता असेही शुक्ला म्हणाले आहेत. या मोहिमेचा निरोप समारंभ नुकताच पार पडला ज्यामध्ये शुक्ला बोलत होते. ते म्हणाले की, 25 जून रोजी जेव्हा मी फाल्कन 9 रॉकेटवरून हा प्रवास सुरू केला तेव्हा मला वाटले नव्हते की हा प्रवास इतका अविश्वसनीय असेल. माझ्या मागे उभ्या असलेल्या टीमशिवाय हा प्रवास इतका अविश्वसनीय झाला नसता. येथे असणे खूप आनंदाची गोष्ट आहे. शुभांशू म्हणाले की, गेल्या अडीच आठवड्यात आम्ही अंतराळ स्थानकावर विज्ञान उपक्रम केले, आउटरीच उपक्रम केले, त्यानंतर आम्हाला जो काही वेळ मिळाला, आम्ही अंतराळ स्थानकाच्या खिडकीतून पृथ्वीकडे पाहिले.
शुभांशु शुक्ला त्यांच्या निरोपाच्या भाषणात पुढे म्हणाले की,- “माझा हा प्रवास कमालीचा राहिला आहे. पण आता माझा हा प्रवास संपणार आहे, पण तुमचा आणि माझा प्रवास अजून खूप दूरपर्यंत आहे. आपला ह्यूमन स्पेस मिशनचा प्रवास खूप लांबचा आणि कठीण देखील आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो की आपण जर निश्चय केला तर ती शक्य आहे.”
आजचा भारत महत्वकांक्षी, निर्भीड, आत्मविश्वासाने भरलेला दिसतो
शुक्ला यांच्यापूर्वी अंतराळात गेलेले पहिले अंतराळविर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारत कसा दिसतो या प्रश्नाचे उत्तर देताना ‘सारे जहाँ से अच्छा’ असे उत्तर दिले होते. त्या ओळींना शुक्ला यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. शुक्ला म्हणाले की, “४१ वर्षांपूर्वी एक भारतीय अंतराळात गेले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितले होते की वरून भारत कसा दिसतो. कुठेतरी आपल्या सर्वांना जाणून घ्यायचे आहे की आज भारत कसा दिसतो, मी तुम्हाला सांगतो. आजचा भारत स्पेसमधून महत्वकांशी दिसतो, आजचा भारत निर्भीड दिसतो, आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला दिसतो, आजचा भारत अभिमानाने भरलेला दिसतो. याच सर्व कारणांमुळे मी पुन्हा एकदा म्हणू शकतो की आजचा भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो. लवकरच जमिनीवर भेटू.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





