
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सहकार क्षेत्रात निवडणुका होणे किंवा त्या बिनविरोध होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे राजकीय हेतूने पाहणे योग्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपापले उमेदवार उभे करण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार आहे; त्यामुळे कोण, कुठे जातो याला फारसे महत्त्व नाही, अशा शब्दांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप नेते आणि आ. राम शिंदे यांच्या जिल्हा बँक निवडणुकीतील भूमिकेवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली.
गेल्या दोन दिवसांपासून आ. शिंदे यांनी उत्तर नगर जिल्ह्यात विखे विरोधी गटातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. या दौर्याबाबत विखे पाटील यांना विचारले असता, त्यांनी शिंदे यांच्या दौर्याला फारसे महत्त्व न देता, प्रत्येकाला अधिकार असल्याने कोण कुठेही जाऊ शकते, असे म्हणत हा दौरा फेटाळून लावला. दुबार पेरणीच्या संकटाशी लढण्यास सरकार सज्जराज्यात अनेक भागांत 80 टक्क्यांपेक्षा जास्त पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते.
आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, नगर आणि राहुरी परिसरात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे सध्या तरी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. तरीही, पुढील काळात पाऊस न झाल्यास आणि दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकर्यांना मदत करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली.
जलजीवनमधील त्रुटींवर सरकारने घातले लक्ष
राज्यात जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी दुरवस्था आणि गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे. ज्या ठिकाणी त्रुटी होत्या, तिथे जलजीवन योजनेच्या कामांमध्ये तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




